ताजिकिस्तान या मध्य आशियाई देशात असलेला परकीय भूमीवरचा भारताचा पहिला आणि
एकमेव हवाईतळ बंद झाल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने
एका प्रश्नाच्या उत्तरात याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर त्याबाबत प्रतिक्रिया येऊ
लागल्या आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा हवाईतळ वापरण्यासंबंधी
केलेला 2022 मध्ये संपुष्टात आल्यावर भारतानं ऐनीमधून आपले सैन्य आणि साधनसामग्री
काढून घेतली होती. या पार्श्वभूमीवर ऐनीच्या तळासंबंधी वास्तविक माहिती देण्याचा
प्रयत्न.
मध्य आशियाई देशांशी विविध पातळ्यांवर सहकार्य वाढवून त्या क्षेत्रातील आपले सामरिक हितसंबंध जपण्याचा भारताचा कायम प्रयत्न राहिला
आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये त्या क्षेत्रातील देशांबरोबरचे सहकार्य अधिकाधिक
व्यापक होत गेले आहे. त्याच सहकार्याच्या एक भाग म्हणून भारताने
ताजिकिस्तानबरोबरचे लष्करी सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी पुढाकार घेत तिथं आपला हवाईतळ
उभारण्यासंबंधीचा करार केला होता.
सुमारे पावणेसहा
कोटी लोकसंख्या आणि सुमारे 40 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मध्य आशियाचे
स्थान भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे. भारतासाठी राष्ट्रीय आणि ऊर्जा
सुरक्षेच्या तसेच आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिकदृष्टीनेही मध्य आशियाचे महत्त्व
अनन्यसाधारण आहे. म्हणूनच त्याच्याशी लष्करी सहकार्य वाढवून त्याद्वारे आपल्या
सामरिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी भारताने हालचाली सुरू केल्या. माजी
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 2003मधील ताजिकिस्तानचा दौरा त्यादृष्टीने
महत्त्वाचा ठरला होता. त्यावेळी ताजिकिस्तानची अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा
आणि पाकव्याप्त काश्मीरशी असलेली भौगोलिक जवळीक लक्षात घेऊन त्याच्याशी भारताने
`संरक्षण सहकार्य करार' केला होता. त्याचबरोबर ताजिकिस्तानात भारताचा परकीय
भूमीवरील पहिलावहिला हवाईतळ स्थापन करण्यासाठी भारत-ताजिकिस्तान-रशिया असा
त्रिपक्षीय करार झाला होता. त्या करारानुसार ताजिकिस्तानातील ऐनी येथील सोव्हिएटकालीन
हवाईतळाचं पुनरुज्जीवन करून भारत तिथं आपली लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करणार
होता. हा तळ ताजिक राजधानी दुशान्बेपासून 15 किलोमीटरवर वसलेला आहे. तिथे आपली
`मिग-29' स्वनातीत (सुपरसॉनिक) बहुपयोगी लढाऊ विमाने आणि
काही हेलिकॉप्टर तैनात करण्याची भारताची योजना होती.
भारताच्या `सीमा
रस्ते संघटने'ने (Border Road Organisation) या तळावर लढाऊ विमानांच्या
देखभालीसाठीचे हँगर बांधले आहेत. भारताने 2007मध्ये या तळाची पुन:उभारणी पूर्ण
केली. मात्र त्यानंतर या तळावर लढाऊ विमानं तैनात करण्याची परवानगी दुशान्बेकडून भारताला
मिळाली नाही. ती परवानगी मिळावी यासाठी नवी दिल्लीकडून दुशान्बेकडे वरचेवर
पाठपुरावा करण्यात येत होता. माजी उपराष्ट्रपती महंमद हामीद अन्सारी यांच्या
एप्रिल 2013मधील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2015 मधील आणि माजी
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या 2018 मधील दौऱ्यांच्या वेळीही या तळाच्या मुद्द्यावर
चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते. कोविंद यांनी तर या तळाला प्रत्यक्ष भेटही
दिली होती. सध्या ताजिकिस्तान आणि रशिया संयुक्तपणे या तळाचा वापर करत आहेत.
रशियाला मध्य आशियातील आपलं अस्तित्व अधिक बळकट करायचं असल्यामुळं ऐनीच्या तळावर
रशियन लढाऊ विमानं तैनात करण्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली आहे.
2003 मधील त्रिपक्षीय
करारानुसार ऐनीच्या तळावर भारताचे शंभर लष्करी अधिकारी आणि जवान तैनात असले तरी ते
प्रामुख्याने ताजिकिस्तानाच्या लष्करी दलांना प्रशिक्षण देण्याचे काम करत होते.
तसंच ताजिकिस्तानातील कुरघोंतेप्पा (Qurghonteppa) इथं भारताने अद्ययावत `India-TajikistanFriendship Hospital' उभारले असून तिथे भारतीय भूदलाच्या वैद्यकीय सेवेच्या
अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून ताजिक लष्कर आणि आसपासच्या परिसरातील सामान्य जनतेची
शुश्रुषा केली जात होती. या रुग्णालयासाठी आवश्यक साधनसामग्रीची मदत जुलै 2022
मध्ये भारताने पाठवली होती. काही वर्षांपूर्वी ताजिकिस्तानच्या विनंतीवरून त्याला भारताने
दोन एमआय-17 हेलिकॉप्टरही पुरविली होती. याआधी अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता
बळकाविल्यानंतर त्या विरोधात लढणाऱ्या अहमद शाह मसूदच्या Northern Alliance च्या लढवय्यांसाठी भारताने
ताजिकिस्तानातील फारखोरच्या हवाईतळावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती.
15 ऑगस्ट 2021
ला नाटोच्या फौजा अफगाणिस्तानातून माघारी गेल्यावर तिथं निर्माण झालेल्या अतिशय
गोंधळाच्या परिस्थितीत भारताने हवाईदलाच्या विमानांमार्फत आपल्या नागरिकांची
सुखरुप सुटका केली होती. त्यासाठी ताजिकिस्तानातील ऐनीच्या विमानतळाचा वापर केला
होता.

खूपच सुंदर व अभ्यासपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाखूप अभ्यास पूर्ण आणि माहिती पूर्ण लेख
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट माहिती दिली.
उत्तर द्याहटवा