गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

 

शिलाई पद्धतीनं बांधण्यात येणाऱ्या पारंपारिक जहाजाची प्रतिकृती (फोटो-पीआयबी)

 

      5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस लॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतात प्राचीनकाळी जहाजबांधणीसाठी वापरल्या जात असलेल्या शिलाई पद्धतीचं (stitched) पुनरुज्जीवन करून एक शिडाचं जहाज बांधलं जात आहे. गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला त्या जहाजाची बांधणी सुरू झाली आहे. यंदाच्या सागरी दिनाच्या निमित्तानं त्या जहाजाविषयीचा लेख.

      भारताचा सागरी इतिहास सिंधू संस्कृतीच्या काळापासून सुरू होतो. तेव्हापासून पुढील अनेक शतकं भारताचा आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावर दबदबा होता. त्या काळातलं भारतामधील जहाजबांधणी तंत्रज्ञानही जगात सर्वोत्कृष्ट मानलं जात होतं. त्या वारशाची आठवण म्हणूनच भारतीय नौदल, संस्कृती मंत्रालय आणि गोव्यातील मेसर्स होडी इनोव्हेशन यांनी एकत्रितपणे हा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी 9 कोटी रुपये खर्च येणार असून तो संपूर्ण खर्च संस्कृती मंत्रालय करणार आहे. बांधणी पूर्ण झाली की, ते जहाज ओडिशाहून इंडोनेशियातील बालीपर्यंत प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरून प्रवास करणार आहे. त्यावेळी त्या जहाजाचा प्रवास विनाअडथळा व्हावा यासाठी जहाजबांधणी मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सहकार्य करणार आहे. कारण हिंदी महासागराच्या किनारी देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या इतिहासाला उजाळा देणं हे या प्रकल्पाचं आणखी एक उद्दिष्ट आहे.

      अशा प्रकारच्या जहाजाच्या बांधणीतील शिलाईचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले बाबू संकरन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे. प्राचीन तंत्रानुसार या जहाजाच्या लाकडी फळ्यांना सांगाड्याच्या आकाराशी सुसंगत बनवण्यासाठी पारंपारिक वाफेच्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक फळी दोराने दुसऱ्या फळीशी शिवली जाईल. त्या फळ्यांमधील फटी बुजवण्यासाठी नारळाचे फायबर, राळ आणि माशाच्या तेलाच्या मिश्रणाचा वापर केला जाईल. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर प्राचीन दिशादर्शक तंत्राच्या मदतीनं भारतीय नौदल या जहाजाला प्राचीन सागरी व्यापारी मार्गांवरून प्रवास घडवेल.

      शिलाई जहाजबांधणीत खिळ्यांपेक्षा दोराने लाकडी फळ्या एकत्र जोडलेल्या असल्यामुळं ती जहाजं लवचिक, वेगवान आणि अतिशय टिकाऊ असत. अशा जहाजांचं उथळ समुद्रात आणि समुद्रातील वाळूच्या पट्ट्यांपासून संरक्षण करता येत असे. युरोपियन सत्तांच्या भारतातील आगमनानंतर येथील पारंपारिक जहाजबांधणीचा व्यवसाय लोप पावला असला तरी आजही काही ठिकाणी छोट्या मासेमारी बोटी शिलाई तंत्रज्ञानानं बनवल्या जात आहेत.

      शिलाई जहाजाचं भारतीय तंत्रज्ञान सुमारे 2,500 वर्षे जुनं आहे. भारताच्या इतिहासात, जडणघडणीत समुद्राचा, त्याद्वारे चालणाऱ्या व्यापाराचा वाटा बराच मोठा राहिला आहे. भारताच्या सागरी व्यापाराचे लिखित पुरावे सिंधू संस्कृती आणि गुजरातमधील लोथल येथील प्राचीन गोदीच्या उत्खननात सापडलेले आहेत. ते पुरावे इसवीसन पूर्व 2,500 वर्षांपूर्वीचे आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, अन्य प्रदेशांशी सांस्कृतिक देवाणघेवाण आणि अन्वेषणात शिलाई जहाजांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आजही भारताचा 90 टक्के व्यापार सागरी मार्गानंच होतो आहे.

      प्राचीन तंत्रावर आधारित या जहाजाची बांधणी करण्यासंबंधीचा करार भारतीय नौदल, संस्कृती मंत्रालय आणि मेसर्स होडी इनोव्हेशन यांच्यात 18 जुलै 2023 ला करण्यात आला होता. त्या करारनुसार 22 महिन्यांमध्ये या जहाजाची बांधणी पूर्ण केली जाणार आहे.

शिलाई जहाजाच्या मुख्य आधारशीला (keel) बसवण्याचा समारंभ (फोटो-पीआयबी)


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा