मॉरिशसमधले भारताचे तळ


      भारतानं मॉरिसशच्या उत्तरेला वसलेल्या आगालेगा (Agalega Island) बेटावर एक धावपट्टी (runway) आणि धक्का (jetty) विकसित केले आहेत. गेल्या 29 फेब्रुवारीला या दोन्हींचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मॉरिशसच्या दूरवरच्या बेटांदरम्यानचा संपर्क जलद आणि सहज व्हावा यासाठी भारतानं त्या देशाला या दोन्ही पायाभूत सुविधा उभारून दिल्या आहेत. त्यातून हिंदी महासागरी क्षेत्रामधली भारताची सुरक्षा आणि राष्ट्रहितांचं संरक्षण अधिक सक्षमपणे करणं नवी दिल्लीला शक्य झालं आहे.

      मॉरिशसचं हिंदी महासागरामधलं स्थान सामरिकदृष्ट्या महत्वाचं आहेच; पण त्याचवेळी आगालेगा बेटाचं स्थान तर त्याहूनही अधिक सामरिकदृष्ट्या महत्वाचं ठरत आहे. अशा बेटावर एक धावपट्टी आणि एक धक्का उभारण्यासंबंधीचा करार मार्च 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस भेटीमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार आता आगालेगा बेटावर हवाई आणि सागरी वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तसंच त्या कराराद्वारे या बेटावर आणखी 6 सामुहिक विकास प्रकल्प (Community Development Projects) उभारण्यात येणार आहेत. पण या धक्क्याचं आणि धावपट्टीचं आता उद्घाटन झाल्यामुळं देशाच्या एका टोकाला असलेल्या आगालेगा बेटाचा मुख्य बेटाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

      नवी दिल्ली आणि पोर्ट लुईस यांच्यात अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. दोन्ही देशांमधल्या संबंधांना त्यांच्यातील ऐतिहासिक दुव्यांमळं बळकटी आलेली आहे. मॉरिशसची 70% लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. त्यामुळं दोन्ही बाजूंच्या सामान्य लोकांमध्येही घनिष्ठ संबंध प्रस्थापित झालेले आहेत. दोन्ही देशांमधल्या संबंधांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांचा भक्कम आधार मिळालेला असून त्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतानं मॉरिशसच्या विकासात कायमच सढळपणे मदत केली आहे. भारताला पोर्ट लुईसच्या Partner of Preference चा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासून भारत नागरी विकासकामं, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मॉरिशसला मदत करत आहे. मॉरिशसची इंधनाची संपूर्ण गरज भारत भागवत आहे. मॉरिशस स्वत:ला दक्षिण हिंदी महासागरामधलं पेट्रोलियम हब म्हणून विकसित करू इच्छीत आहे. त्यासाठीही भारत त्याला सहकार्य करत आहे.

      भारतानं अलीकडच्या काळात मॉरिशसला 1,000 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं सहाय्य दिलेलं आहे. मेट्रो रेल्वेची उभारणी, सामाजिक निवासस्थानं, कान-नाक-घशाचं रुग्णालय, नागरी सेवा महाविद्यालय, क्रीडा संकुलं अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीतही भारत मॉरिशसला मदत करत आले आहे.

पोर्ट लुईसला पोहचलेली भारतीय नौदलाची 'शार्दुल' 

      भारताच्या दृष्टीनं हिंदी महासागरी क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही नवी धावपट्टी आणि धक्का भारताला आपल्या सागरी हितांचं संरक्षण करण्यासाठी मदत करणार आहे. भारत मॉरिशसला त्याच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (Exclusive Economic Zone) देखरेखीसाठी, संयुक्त गस्तीसाठी, सागरतळाच्या सर्वेक्षणासाठी (Hydrographic Survey) तसंच मानवीय मदत आणि आपत्ती निवारणातही (HADR) मदत करत आला आहे. त्यासाठी भारताच्या युद्धनौका, सर्वेक्षक जहाजं, टेहळणी विमानं नियमितपणे मॉरिशसला भेट देत आहेत. पण त्यांचा त्या क्षेत्रातला वावर आगालेगाच्या उद्घाटनामुळं अधिक सुकर होणार आहे. भारतीय नौदल मॉरिशसच्या तटरक्षक दलाला चाचेगिरीविरुद्ध (piracy) आणि एकूणच सागरी सुरक्षेसाठी मदत करत आहे.

(फोटो-पीआयबी)

टिप्पण्या