वाई ते पुणे

 


      अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली.

      पोलादपूर ते स्वारगेट बस कोणत्या मार्गावरून जाते, हे पाहिल्यावर असा पूर्ण प्रवास एकदा करावा असं वाटू लागलं. बसच्या फलकावर पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-खंडाळा-शिरवळ-स्वारगेट असे लिहिलेलं होतं. वाईचा 10 मिनिटांचा थांबा उरकून ती बस पुढच्या प्रवासासाठी निघाली. अस्सल राज्यपरिवहनच्या तांबड्या-भगव्या रंगसंगतीमधल्या त्या बसची अवस्था तशी विचित्रच होती. सीट्स जुन्या झालेल्या होत्याच, शिवाय दरवाजा, खिडक्या आणि एकूण सगळंच थोड्या-अधिक प्रमाणात खिळखिळं झालेलं वाटत होतं. मग असं मनात आलं की, पोलादपूर ते स्वारगेट असा तीन घाटांचा प्रवास अशी गाडी कशी काय पार करत असेल. आमच्या मागच्या रांगेमधल्या एका बाजूच्या सीट्स काढून टाकलेल्या होत्या. तिथं बसचं भलमोठं अतिरिक्त चाक (स्टेपनी) ठेवलेलं होतं.

आता पुढच्या प्रवासात एकेक अनुभव येऊ लागले. वाईमधून बस निघाली आणि वाहक (कंडक्टर) नवीन आलेल्या प्रवाशांकडे जाऊ लागला. तो हळुहळू मागे सरकत आमच्या जवळ आला, तेव्हा आधी त्यानं मधल्या जागेत आमच्या शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेला तिकिटाबद्दल विचारलं. तिनं 60 रुपये त्याच्याकडे देऊन स्वारगेट असं सांगितलं. तिच्याबरोबर साधारण 5 ते 7 वर्षांदरम्यानची दोन लहान मुलंही होती. कंडक्टर तिला म्हणाला, स्वारगेटचं भाडं 125 होतं. अजून पैसे द्या. त्यावर ती म्हणाली, माझ्याकडं तेवढेच आहेत. मग त्याचं तिच्याबरोबरच्या मुलांकडेही लक्ष गेलं आणि त्यानंतर त्यानं त्या सगळ्यांचे तिकिटाचे पैसे मागितले. पण ती त्याला तेच उत्तर परत देत होती. मग वाहक वैतागला. तिला तो सांगत होता की, पैसे नसतील तर खाली उतरा. त्यावर ती कंडक्टरला म्हणाली, तुम्ही मागून घ्या बसमधल्या कोणाकडून तरी. मग तो अजूनच वैतागला. तो म्हणाला की, मी मागणार नाही आणि कोणी देणार नाही पैसे. पैसे नाहीत, तर यायचं कशाला बसमध्ये. त्यावर परत ती म्हणाली की, तुम्ही मागा कोणाकडे तरी. मागितले की लोकं देतात पैसे. ती महिला हे सगळं अगदी विश्वासानं बोलत होती. तिचा तो विश्वास पाहून आम्ही चक्रावलो होतो. हा सगळा प्रकार पाहून अगदी पुढं बसलेल्या एका महाविद्यालयीन मुलीनं कंडक्टरला विचारलं की, किती पैसे कमी पडत आहेत आणि वरचे पैसे ती देऊ लागली. कंडक्टरनं त्या मुलीला विचारलं, सगळे पैसे देणार आहेस का?” तिनं पैसे दिले आणि शेवटी त्या बाई-मुलांना तिकिटं दिली गेली.

बस आता दिल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर आली होती. पोलादपूरपासून जवळपास अखंडपणे पळत असलेली ही बस आता महामार्गाला लागूनच असलेल्या पारगाव-खंडाळा बसस्थानकात जाऊन काही वेळ विसावली होती. नाश्त्यासाठी तिथं बस थांबेल, असं वाईतून बस सुटताना वाहक सतत सांगत होताच. बसमधला प्रत्येक जण तिथं काही ना काही खाण्यासाठी, पाय मोकळे करण्यासाठी उतरला होता. आम्हीसुद्धा तिथं चहा घेतला. पारगाव-खंडाळ्याचा विसावा आटपून बस 20 मिनिटांनी पुण्याकडे निघाली. स्थानकातून बस बाहेर पडून पुण्याच्या दिशेला येत आहे हे पाहून आताच बसमध्ये चढलेल्या आणि अगदी पुढं बसलेल्या एका महिलेनं गोंधळलेल्या सुरात वाहकाला विचारलं, बस वाईला जात नाही आहे?” मग त्यानं तिला स्वारगेला चालली आहे गाडी असं सांगितल्यावर ती बसमधून खाली उतरली.

पारगाव-खंडाळ्याला आणखीही काही प्रवासी बसमध्ये चढलेले होते. तोपर्यंत आमच्या जवळच्या रिकाम्या आसनांवर आई आणि तिची दोन तरुण मुलं येऊन बसली होती. बस सुटल्यावर त्यांच्यातल्या तरुणीला लक्षात आलं की, तिची आणि आईची, दोघींच्याही पर्सेस घरीच राहिल्या आहेत. त्यांनी बरोबरच्या तरुणाला विचारलं पैशाबाबत, तर तो म्हणाला की, त्यानं पैसे घेतलेले नाहीत. मग तडकाफडकी ती तरुणी वाहकाकडे जाऊन विचारून आली की, जीपेनं तिकिटाचे पैसे दिले तर चालतील का. त्यानं नाही म्हटल्यावर त्यांची बेचैनी वाढू लागली. वाहक आता या प्रश्नामुळं पुन्हा वैतागलेला होताच. तोपर्यंत त्या तरुणीनं आणि तिच्या आईनं आम्हाला विचारलं की, तुमच्याकडे जीपे आहे का. हो म्हटल्यावर त्या तरुणीनं लगेच 300 रुपये ऑनलाईन पाठवून आमच्याकडून रोख पैसे घेतले. आता त्या तिघांचा जीव भांड्यात पडला होता, हुश्श्श!”

आता नव्या प्रवाशांना तिकिटं देत वाहक मागं आमच्या दिशेनं येत होता. आतापर्यंत पारगाव-खंडाळ्याच्या पुढे 4-5 किलोमीटरवर बस आली होती. त्या तिघांजवळ येऊन त्यानं तिकीटाबद्दल विचारलं. त्या तरुणीनं अगदी आत्मविश्वासानं 3 वाई म्हटलं. आता वाहक पुन्हा वैतागला, अहो मॅडम, बस स्वारगेटला निघाली आहे. आता ते तिघं मगाचपेक्षा जास्तच गोंधळले. बस इतक्या पुढं येईपर्यंत त्यांच्या हेही लक्षात आलं नव्हतं की, बस दुसरीकडेच निघाली आहे. मग ते तिघंही बस थांबवा, आम्ही खाली उतरतो असं वाहकाला सांगू लागले. त्यांचा गोंधळ पाहून शेवटी वाहकानं जरा आधाराच्या स्वरात त्यांना सांगितलं, गाडी बरीच पुढं आली आहे. आता शिरवळला उतरा. तिथून तुम्हाला बस मिळतील. शिरवळ आल्यावर ते तिघं खाली उतरू लागले, पण तेवढ्यात आमचं लक्ष गेलं की, त्यांच्या किल्ल्या शेजारच्या सीटवर पडलेल्या आहेत. मग आम्ही त्यांना हाक मारली आणि किल्ली त्यांच्याकडे देऊन टाकली. या तिघांचा गोंधळ पाहून आम्ही आपापसांत बोलत होतो. आम्हाला आश्चर्य वाटत होतं की, इथेच राहणारे वाटत असून त्यांना बस दुसरीकडेच निघाली आहे, हे कसं काय लक्षात आलं नाही त्यांच्या. किती गोंधळ चालला होता त्यांचा वगैरे वगैरे. कदाचित काही तरी गंभीर, तणावपूर्ण घडलं असेल आणि तिकडं जायच्या गडबडीमुळंच त्यांचा इतका गोंधळ सुरू असेल यावर आमचं एकमत झालं.

आमची बस कुठं निघाली आहे याचा खंडाळ्यापर्यंत लोकांचा गोंधळ होत होता, त्याला कारणीभूत ठरत होता बसवर लावलेला फलक. तो फलक वाचून कोणालाही न विचारता/न खात्री करून घेता बसमध्ये बसणारे हमखास फसत होते.

शिरवळला काही प्रवासी उतरले आणि काही जण बसमध्ये आले. वाईला आम्ही बसल्यापासून सुट्ट्या पैशावरून कंडक्टरचं प्रत्येकाला आवाहन सुरू होतं. आता त्या आवाहनाचा सूर जरा वैतागलेल्या स्वरुपाचा होता, कारण आता शिरवळहून स्वारगेटपर्यंत तिकीटाचा दर कमी होता आणि प्रत्येक जण शंभरच्याच नोटा काढत होता. सुट्टे पैसे द्या, असं सांगूनही काही उपयोग होत नव्हता. मग दोघा-तिघांनी जणांनी जरा नाखुषीच्या हावभावानं कंडक्टरला सुट्टे पैसे दिले. आता निरा नदी ओलांडून पुणे जिल्ह्यात बस आली होती. या सर्वांची तिकिटं काढून होताहेत, तोवर बस अचानक रस्त्याच्या बाजूला थांबली. बाहेर बघितलं तर महामार्गावर पुण्याकडे येणारी एक बस खेड-शिवापूरच्या आधी बंद पडलेली होती. पुण्याकडे जाणाऱ्या बसला हात दाखवून थांबवून त्यात त्या बसमधल्या प्रवाशांची सोय करून देण्यासाठी त्या बसचे चालक-वाहक खाली उतरलेले होतेच. पण आमच्या बसमध्ये गर्दी असल्याचं खालूनच दिसल्यावर त्यांच्यापैकी काही प्रवासी आमच्या बसमध्ये येत नव्हते. पण तो कंडक्टर त्यांना आवाहन करत होता की, अहो, जावा की या बसमधनं. इतका वेळ थांबलोय आपण आपण बसची वाट बघत. आता गर्दी असली तरी जावा. मग त्या प्रवाशांसह आमची बस पुण्याकडे निघाली.

बंद पडलेल्या बसमधून या बसमध्ये चढलेले पांढरा सदरा आणि धोतर नेसलेले आजोबा आमच्या जवळच्या स्टेपनीवर पळतपळत जाऊन बसले. पण त्यावेळी त्यांना आपली पत्नी दिसली नाही, आजूबाजूला. मग त्यांनी जोरात आवाज दिल्यावर त्या आजीबाईंनी पुढून प्रतिसाद दिला. मग त्यांनी आजींसह त्या स्टेपनीवर बसून पुण्यापर्यंतचा प्रवास केला. ज्यांना उभारून प्रवास करावा लागत होता, त्यांचे चेहरे जरा त्रासिकच दिसत होते. त्यांच्यापैकी एक-दोघे जण हळूच इकडे-तिकडे आशेच्या नजरेने बघत होते, पण कोणाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं की मात्र आपण खिडकीतून बाहेर बघत आहोत, असा भाव चेहऱ्यावर आणत होते.

खेड-शिवापूरचा टोल नाका ओलांडल्यावर आमचं आपापसांत बोलणं सुरू होतं, स्वारगेटला पोहचल्यावर आपल्या गाडीचा कंडक्टर सुटकेचा नि:श्वास सोडेल. सकाळपासून या बसमध्ये बऱ्याच जणांनी त्याचं डोकं खाल्लं आहे. चित्र-विचित्र अनेक प्रवासी त्याला भेटले असतील वगैरे वगैरे.

आता कात्रजच्या घाटातून जुन्या बोगद्याकडे बस निघाली होती. पुढे बोगदा ओलांडून बस स्वारगेटच्या दिशेनं निघाली होती. आता घड्याळाकडे लक्ष गेल्यावर लक्षात आलं की, बस तशी वेळेतच पोहचत आहे, जरी बस खिळखिळी वाटत असली तरी!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा