खंडाळ्याच्या घाटासाठी...

राजमाची पॉईंट

      लोणावळ्याला जाणं बऱ्याचवेळा झालं आहे, पण खंडाळ्याला जाणं होत नव्हतं. खंडाळा कायम मुंबईला जातानाच गाडीतून पाहिलं होतं. यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. आज जाऊ, उद्या जाऊ असं करत तिथं जाणं सतत पुढं जात होतं. शेवटी अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं. त्यामुळं सकाळची शेवटची लोकल पकडली आणि लोणावळ्याकडे निघालो. आता इथंपर्यंत तरी सगळं मिनिटामिनिटाच्या हिशेबानं पार पडत होतं.

      पुण्याहून शिवाजीनगरला वेळेत आली आणि निघालीही. सगळे थांबे घेत ती देहू रोडला पोहचली आणि पाच मिनिटं झाली तरी हलतच नव्हती. पुढं 10-15-20 मिनिटं होत गेली तरी लोकल जागची हलत नव्हती. आता मग लोकांमध्ये चलबिचल सुरू झाली. फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ घेऊन बऱ्याच जणांचा Time pass सुरू झाला. लोकल का थांबली आहे, कोणालाच समजत नव्हतं. माझ्या समोरच बसलेल्या एका बाईंना त्यांचा मुलगा सांगत होता की, वडिलांचा आता त्याला फोन आला होता. त्यानं त्यांना सांगितलं की, लोकल देहू रोडवर बराच वेळ थांबली आहे. मग त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की, घोरावाडीत मालगाडी बराच वेळ एकाच जागी उभी आहे, बहुतेक इंजिन फेल झालं आहे. त्यांना ते घराच्या खिडकीतून दिसत होतं. हे सगळं तो नंतर आईला सांगत होता. दरम्यान, काही जणांचा विचार सुरू होता, ‘’काय करायचं, बाहेर पडून बसनं जायचं का?’’ काही जण खास करून ज्यांना पुढची गाडी लोणावळ्यातून पकडायची होती असे, ते उतरून दुसऱ्या पर्याय निवडून निघूनही गेले. आता लोकलमधले बरेच जण खाली फलाटावर रेंगाळत होते. तोपर्यंत शेजारून डाऊन लाईनवरून कोयना चिंचवडकडे गेली. तोपर्यंत लोकलच्या मोटरमननं मध्ये एकदा हॉर्न वाजवल्यावर सगळे धावत-पळत लोकलमध्ये चढले. त्यानंतर ते पुन्हा खाली उतरले. काही वेळानं पलिकडच्या लाईनचा स्टार्टर सिग्नल पिवळा-हिरवा झालेला पाहून खाली उतरलेले पुन्हा धावत-पळत गाडीत चढले. त्यांना वाटलं आपल्याच गाडीला सिग्नल दिला आहे. मग परत खाली उतरले.

      काही वेळानं 2 WAG-7 इंजिनं शेजारच्या लाईनवर येऊन थांबली होती. मग डब्यात चर्चा सुरू झाली की, हीच इंजिनं त्या बंद पडलेल्या मालगाडीला लावतील, ती गाडी मग तळेगावला नेतील आणि मग लोकल पुढे निघेल. पण ती इंजिनं पुढे सोडली नाहीत, उलट लोकलच पाच मिनिटांनी - 54 मिनिटं देहू रोडला थांबून - पुढे मार्गस्थ झाली. तळेगावात पोहचल्यावर पाहिलं तर ती मालगाडी तिथं उभी होती. मग माझ्या लक्षात आलं की, घोरावाडीत इंजिन बंद पडलेलं नव्हतं, तर तिथं रुळांखाली खडी ओतणारी मालगाडी उभी होती, खडी ओतत होती म्हणून तिथं थांबून होती.

      अखेर 2 तास 15 मिनिटांचा प्रवास करून शिवाजीनगरहून लोणावळ्याला पोहचलो. थंड हवेच्या ठिकाणी जास्तच गरम होत होतं, ढगाळ हवासुद्धा होती. मग विचार करत होतो की, खंडाळ्याला अशा वातावरणात जायचं की नाही, कारण ढगाळ हवेमुळे फोटो नीट येणार नाहीत. थोडं खाणं झाल्यावर म्हटलं, “बघुया जाऊन पुढं!. किमान खंडाळ्याच्या स्टेशनपर्यंत तरी जाऊन येऊ. असा विचार करून चालायला लागलो. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुढं निघालो.

खंडाळा तलाव

       मजल-दरमजल करत, वाटेत फोटो काढत खंडाळा स्टेशनपर्यंत पोहचलो. मग म्हटलं, जाऊ अजून पुढं, खंडाळा व्ह्यू पॉईंटपर्यंत तरी जाऊया इथंपर्यंत आलोय तर. मग तसंच चालत राजमाची पॉईंटवर पोहोचलो. तिथून दिसणारा उल्हास नदीचा धबधबा आणि तिचं खोरं पहिल्यांदाच इतक्या शांतपणे न्याहाळू लागलो होतो. मस्त वाटत होतं. तिथूनच दूरवर मंकी हिल केबिनच्या पुढचा रेल्वेचा बोगदा दिसत होता आणि माझ्या खाली खंडाळ्याच्या बोगद्यातून बाहेर पडलेला आणि लोणावळ्याकडे जाणारा Expressway थोडासा दिसत होता. त्याच बोगद्याचे आणि एकूणच या परिसराचे फोटो काढण्याचा उद्देश ठेवूनच मी आज इथंपर्यंत पोहोचलो होतो, पण इथून Expressway चे बोगदे मात्र नीट दिसत नव्हते.

      राजमाची पॉईंटपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. उल्हास नदीचं खोरं तिथून न्याहाळून झाल्यावर मी थोड्या वेळानं खंडाळा व्ह्यू पॉईंटकडे निघालो. लांबूनच त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या दिसू लागल्या होत्या. तिथं पोहोचल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर दिसलं ते पाहून मनातल्या मनात
“Ohh wowww” असे स्वर उमटले. जुना महामार्ग, त्याच्या खाली Expressway आणि त्या खाली लोहमार्ग, या सगळ्या मार्गांवरून सुरू असलेली अखंड वाहतूक, समोर जुन्या रिव्हर्सिंग स्टेशनचे अवशेष, सह्याद्रीचे कोकणाकडचे आणि खाली दरीत दिसत असलेलं खोपोली. तिथं पोहोचत असतानाच 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुरात्ची थलालवर डॉ. एम. जी. राजचंद्रन चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दिसली, म्हणजे तिचे टपच दिसले. मस्त दृश्य दिसत होतं या पॉईंटवरूनही. मग मनात आलं की, आज स्वच्छ हवा चांगली असती तर.

खंडाळा व्ह्यू पॉईंटवरून दिसणारं खोपोली

      आता ठरवलं इथंपर्यंत आलोच आहे, तर तसंच आणखी चालत खाली अमृतांजन पॉईंटपर्यंत तरी जाऊन यावं. मग लागलो पुढं चालायला. इथून थोड्याच अंतरावर घाटरस्त्याची डागडुजी सुरू होती. अमृतांजन पॉईंटच्या जवळ पोहचल्यावर तिथून दिसणाऱ्या घाटाचं दृश्यही मस्त दिसत होतं. एकीकडे दरीत खोपोली शहर, दुसरीकडे सह्यकडे, जुन्या महामार्गाखालून जाणारा Expressway आणि समोरच्या डोंगरावरून छोटीशी दिसणारी आगगाडी! मग तिथं जरा जास्त वेळ रेंगाळलो. आजपर्यंत फक्त बस आणि ट्रेनच्या खिडकीतून पाहिलेलं दृश्य तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहत असल्यामुळे खूपच उत्साहित वाटत होतं.

        पूर्वीच्या अमृतांजन पुलाच्या जागी गेल्यावर आता जरा काही तरी थंड प्यावं वाटलं. कारण लोणावळ्याच्या स्टेशनपासून इथपर्यंत जवळजवळ सव्वासात किलोमीटर चालणं झालेलं होतं. आता तिथं शिल्लक राहिलेल्या इतिहासाच्या काही खुणांचे फोटो काढून घेतले. कारण तिथंपर्यंत जाण्याचा माझा हेतूच तो होता. त्यानंतर मग परतीच्या मार्गाला लागलो, चालतच. तेव्हाच सुरू झालेला थेंब-थेंब पाऊस लोणावळ्यापर्यंत सुरूच होता. मध्येमध्ये थोडं खाण्यासाठी-पिण्यासाठी छोटा ब्रेक घेत लोणावळा स्टेशनवर पोहोचलो आणि संध्याकाळची लोकलही लगेच मिळाली. एकूणच या परिसराला दिलेली ही पहिलीच भेट खूपच मस्त होती. हे सारं केलं होतं खंडाळ्याच्या घाटासाठी!

पूर्वीच्या अमृतांजन पुलाच्या बाजूनं दिसणारा घाट

टिप्पण्या