नजर 'मलाक्का'वर



       मलाक्काच्या सामुद्रधुनीची आणखी प्रभावीपणे टेहळणी व्हावी या उद्देशाने भारतीय नौदलाने आता तेथे आपली युद्धनौका कायमस्वरुपी तैनात केली आहे. तिच्या मदतीने या सामुद्रधुनीतून येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांवर दिवसरात्र लक्ष ठेवले जाणार आहे. भारतीय नौदलाचे हे पाऊल हिंदी महासागरात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

      भारताच्या दृष्टीने मलाक्काच्या सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व आहे. हिंदी आणि प्रशांत महासागरांना जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून जात असल्याने अन्य देशांसाठीही हे क्षेत्र सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहे. भारताचा आग्नेय तसेच पूर्व आशियाई देशांशी होणारा व्यापार याच जलमार्गाद्वारे चालतो. भारताने 'आसियान' संघटनेबरोबर मुक्त व्यापार करार केल्यापासून दोन्ही बाजूंदरम्यान आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज भारताच्या एकूण आयातीमध्ये एकट्या मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जलमार्गाद्वारे होणाऱ्या आयातीचे प्रमाण ४० टक्के आहे.

      आधीच्या 'पूर्वेकडे पाहा' (Look East) धोरणामुळे भारताला मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक सुरक्षितपणे होत राहणे गरजेचे वाटते. त्यासाठी आता भारताने 'पूर्वेकडे कृती करा' (Act East) धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मलाक्काच्या सामुद्रधुनीजवळ वसलेल्या अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर भारताने भक्कम लष्करी संसाधनांची उभारणी सुरू केली आहे. अलीकडे चिनी नौदलाच्या हिंदी महासागरातील वाढलेल्या हालचालींमुळे तर ही गरज अतिशय तीव्रतेने जाणवू लागली आहे. या ठिकाणी २००१ पासून तिन्ही सैन्यदलांची संयुक्त 'अंदमान-निकोबार कमांड' कार्यरत आहे.

      मलाक्काच्या सामुद्रधुनीचे भारताप्रमाणे अन्य देशांच्या दृष्टीनेही सामरिक महत्त्व आहे. या सामुद्रधुनीतून दरवर्षी सुमारे ९५ हजार मालवाहू जहाजांची ये-जा होते. हिंदी व प्रशांत महासागरांना जोडणारा सर्वांत जवळचा जलमार्ग ही सामुद्रधुनी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यातून जाणारा जलमार्ग जगातील सर्वाधिक वाहतूक होणाऱ्या जलमार्गांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने तेथील काँग्रेसला चीनशी संबंधित लष्करी व सुरक्षाविषयक घडामोडींचा अहवाल सादर केलेल्या अहवालानुसार, २०१६ मध्ये चीनने मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जलमार्गानेच ८० टक्के तेलाची आणि ११ टक्के नैसर्गिक वायूची आयात केली होती. त्याचवेळी चीनचा आफ्रिकन देशांशी होणारा व्यापारही याच सामुद्रधुनीतून चालतो. त्यामुळे पुढील काळात मलाक्काच्या सामुद्रधुनीचे महत्त्व चीनसाठी आणखी वाढेल आणि परिणामी चिनी नौदल या परिसरात अधिक सक्रीय होईल, असेही मत त्यात व्यक्त केले गेले आहे.

      मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम मुखाजवळ वसलेल्या ग्रेट निकोबार बेटावर उभारण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या हवाईतळाचे २०१२ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. आता तेथे नौदलाचे 'पी-८ आय' पाणबुडीविरोधी विमान कायमस्वरुपी तैनात आहे. या विमानाच्या मदतीने मलाक्काची सामुद्रधुनीवर नियमितपणे हवाई टेहळणी केली जात असून सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ग्रेट निकोबारवरील या धावपट्टीचा वापर हवाई दलाच्या अवजड तसेच लढाऊ विमानांसाठीही केला जाऊ शकणार आहे.

      हिंदी महासागरातील सर्वांत मोठी नाविकशक्ती असलेल्या भारतीय नौदलाकडे या महासागराची प्रवेशद्वारे असलेल्या मलाक्का, होर्मुझ आणि बाब-एल-मांदेब या सामुद्रधुन्यांवर नियंत्रण मिळवत युद्धजन्य परिस्थितीत त्यांची नाकेबंदी करण्याची क्षमता आहे. या सर्व सामुद्रधुन्या भारतासाठी सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश भारताच्या प्राथमिक सागरी हितांच्या क्षेत्रात करण्यात आलेला आहे. त्या सामुद्रधुन्यांद्वारे चालणारी भारताची व्यापारी वाहतूक सुरक्षित राहील यासाठी भारतीय नौदल सतत कार्यरत असते. भारतीय नौदलाच्या हिंदी महासागरातील प्रभावाची दखल घेत अमेरिकेने २००१ मध्ये मलाक्काच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आपल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे आवाहन भारताला केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये दोन्ही देशांमध्ये मलाक्काची सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन सागरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करार करण्यात आला आहे.

      भारताचा मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या प्रदेशावर कायम प्रभाव राहिला आहे. हिंदी महासागराचे पूर्वेचे प्रवेशद्वार असलेल्या या सामुद्रधुनीच्या माध्यमातून प्राचीन काळापासून भारताचे आग्नेय आशियाई देशांबरोबर व्यापारी, सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. भारताच्या आग्नेय आशियाई देशांबरोबरील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारतीय नौदलाविषयीही 'आसियान' देशांना विश्वास वाटत आहे. म्हणूनच ते देश तेथील सागरी प्रदेशात सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यात अधिक सक्रीयपणे सहभागी होण्याचे भारताला आवाहन करत आहेत.

      आज देशाच्या विकासासाठी हिंदी महासागरीय क्षेत्रात शांततामय आणि सुरक्षित परिस्थिती कायम राखण्यासाठी भारतीय नौदल 'नाविक राजनय', मानवीय मदतकार्य, युद्धसराव इत्यादींच्या माध्यमांद्वारे या महासागराच्या किनाऱ्यावरील देशांशी सतत देवाणघेवाण करत आहे. त्याचबरोबर संकटकाळात एखाद्या देशाला तातडीने मदत पुरवून या क्षेत्रातील आपला दबदबा भारतीय नौदल कायम राखत आहे.

      मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरातील सामुद्रीक परिस्थितीबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता लक्षात घेऊन भारताने आग्नेय आियाई देशांशी द्वीपक्षीय सुरक्षाविषयक करार केलेले आहेत. त्यामुळे त्याला मलाक्काच्या सामुद्रधुनीत अधिक सक्रीयपणे लक्ष ठेवता येत आहे.

      काही वर्षांपूर्वी चीनच्या पाणबुडीच्या संशयास्पद हालचालीची कूणकूण लागताच मलाक्काच्या सामुद्रधुनीतील देशांनी भारतीय नौदलाला त्याबाबत सूचना दिली होती. त्यानंतर भारतीय नौदलाने 'पी-८ आय' विमानाच्या मदतीने त्या पाणबुडीवर कराचीपर्यंत तिच्या संपूर्ण मार्गावर बारीक लक्ष ठेवले होते.

      दक्षिण चीन सागरातील हैनान बेटावर चीनने पाणबुड्यांचा महत्त्वाचा तळ सुरू केल्यापासून चिनी पाणबुड्यांचा हिंदी महासागरात वावर वाढण्याची शक्यता व्यक्त होत होतीच. त्यापाठोपाठ २००८ पासून सोमाली चाच्यांपासून आपल्या व्यापारी जहाजांची सुरक्षा करण्यासाठी एडनच्या आखातात चीन आपली युद्धनौका आणि पाणबुडी तैनात करत आहे. त्या युद्धनौका-पाणबुड्यांना विश्रांतीसाठी आफ्रिकेतील ड्जीबुटी देशात आपण सुविधा उभारत असल्याचेही चीनने स्पष्ट केले आहे. याबरोबरच पाकिस्तानच्या ग्वादर बंदराकडेही चीनच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची ये-जा वाढलेली आहे.

      चिनी नौदलाच्या वाढत्या हालचालींमुळे भारताच्या हिंदी महासागरातील हितसंबंधांना आव्हान मिळत आहे. अशावेळी हिंदी महासागरातील आपले नाविक वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशाने मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर सतत लक्ष्य ठेवण्याची गरज भारताला भासत आहे. त्यासाठी भारतीय नौदलाने या सामुद्रधुनीजवळच्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात आपली युद्धनौका कायमस्वरुपी तैनात केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा