नवी दिल्ली @ 110

रायसीना टेकडीवरील राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्स (फोटो-पीआयबी)

      ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास दिल्ली दरबार भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले. त्यानंतर 15 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीतील कँपाच्या ठिकाणी सम्राट जॉर्ज यांनी नव्या राजधानीची कोनशिला बसवली.

दिल्लीला आलेले ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) 
आणि राणी मेरी (स्रोत - सैनिक समाचार)

12 डिसेंबर 1911 च्या दिल्ली दरबारनंतर रायसीना टेकडीवर भारताच्या व्हाईसरॉयसाठीचे निवासस्थान आणि अन्य इमारती उभारण्यास सुरुवात झाली आणि नवी राजधानी नवी दिल्ली म्हणून उदयाला येऊ लागली. नव्या राजधानीची कोनशिला बसवण्याच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य जयपूरचे तत्कालीन महाराजा मेजर-जनरल हिज हायनेस सर सवाई माधो सिंग यांनी व्हाईसरॉय्ज हाऊसच्या आवारात जयपूर स्तंभ उभारून ब्रिटिश सम्राटाला भेट दिला. कारण 1911 पर्यंत रायसीना टेकडीचा परिसर जयपूरच्या राजघराण्याच्या मालकीचा होता.

नव्या राजधानीच्या उभारणीचे काम तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स यांच्या देखरेखीखाली सुरू झाले. ही नवी राजधानी वसवण्याची जबाबदारी सर एडविन ल्युटेंस आणि हर्बर्ट बेकर या ब्रिटिश वास्तुरचनाकारांकडे सोपवण्यात आली. नवी दिल्लीच्या उभारणीत प्रामुख्याने ल्युटेन्स यांचेच महत्वाचे योगदान राहिल्यामुळे रायसीना आणि आसपासचा परिसर ल्युटेंस दिल्ली म्हणूनही ओळखला जाऊ लागला.

      ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात महत्वाची वसाहत असलेल्या भारताच्या प्रशासकीय प्रमुखाचे, गव्हर्नर-जनरलचे निवासस्थानही भव्य, वैशिष्टपूर्ण आणि ब्रिटिश साम्राज्याच्या लौकिकाला साजेसे असावे याकडे विशेष लक्ष दिले गेले होते. त्यामुळे व्हाईसरॉय्ज हाऊसची उभारणी करण्याआधी ल्युटेंस यांनी भारतभर फिरून विविध भारतीय वास्तुशैलींचाही अभ्यास केला आणि नवी दिल्लीतील इमारती भारतीय वास्तुशैली आणि युरोपीय वास्तुशैलींचा मेळ साधून उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर व्हाईसरॉय्ज हाऊसचे (सध्याचे राष्ट्रपती भवन) प्रत्यक्ष काम 1914 मध्ये हाती घेण्यात आले. त्याचवेळी व्हाईसरॉयच्या विविध प्रशासकीय विभागांसाठी व्हाईसरॉय्ज हाऊसच्या जवळच साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्सही उभारण्यास सुरुवात झाली. नव्या राजधानीत उभारल्या गेलेल्या सर्व महत्वाच्या इमारतींसाठी पिवळसर आणि तांबूस रंगातील दगड आणि वालुकाश्माचा वापर करण्यात आलेला आहे. व्हाईसरॉयच्या निवासस्थानासाठी सुमारे 30 लाख घनफूट वालुकाश्म वापरला गेला आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 17 वर्षे लागली. याच्या उभारणीसाठी सुमारे 1 कोटी 30 लाख रुपये खर्च आला होता. 1931 मध्ये नव्या राजधानीच्या उद्घाटनाबरोबरच व्हाईसरॉय्ज हाऊसचेही औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटनला सहकार्य केल्यास महायुद्धानंतर त्यांच्या राजकीय मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, असे आश्वासन तत्कालीन भारत सरकारने दिले होते. पुढे 1919 चा भारत सरकार अधिनियम संमत झाला आणि मध्यवर्ती कायदेमंडळ अस्तित्वात येऊन केंद्र सरकारमधील काही दुय्यम खाती लोकनियुक्त भारतीय प्रतिनिधींकडे सोपवली गेली, तरीही भारतीयांच्या मते त्या सुधारणा किरकोळ होत्या. त्यामुळे ब्रिटिश सत्तेविरोधात जनतेमध्ये वाढत असलेला असंतोष कमी करण्याच्या हेतूने ब्रिटिश भारत सरकारने आणखी एक उपाय योजला. पहिल्या महायुद्धातील भारतीयांचे योगदान आपण विसरलेलो नाही हे दर्शवण्यासाठी त्या महायुद्धातील शहीद भारतीय जवानांच्या शौर्याची आठवण म्हणून नवी दिल्लीत एक युद्धस्मारक उभारण्याची घोषणा केली गेली. ते स्मारक म्हणजे आजचे इंडिया गेट (सुरुवातीचे नाव – ऑल इंडिया वॉर मेमोरियल).

इंडिया गेट (फोटो-पीआयबी)
      ड्युक ऑफ कनॉट (Duke of Connaught) यांनी  फेब्रुवारी 1921 मध्ये पायाभरणी केलेल्या या युद्धस्मारकाचे लॉर्ड एटन यांनी फेब्रुवारी 1931 मध्ये उद्घाटन केले.  स्वातंत्र्यपूर्व काळात इंडिया गेटच्या मागील बाजूच्या तळात  असलेल्या तांबड्या दगडातील छत्रीमध्ये सम्राट जॉर्ज (पंचम) याचा पुतळा होता. स्वातंत्र्यानंतर तो पुतळा तेथून हटवला  गेला. या इंडिया गेट आणि व्हाईसरॉय्ज हाऊसदरम्यान तीन किलोमीटर लांबीचा आणि साठ फूट रुंदीचा किंग्स वे  उभारण्यात आला. स्वातंत्र्यानंतर तो राजपथ म्हणून  ओळखला जाऊ लागला.

      पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर माँटेस्ग्यू- चेम्सफर्ड सुधारणांमुळे लागू झालेल्या भारत सरकार अधिनियम-1919 नुसार केंद्रीय विधिमंडळ अस्तित्वात येणार होते. त्याची इमारत रायसीना टेकडीच्या परिसरातच बांधण्याचे ठरले. ती इमारत म्हणजेच आजचे संसद भवन (Parliament House). 12 फेब्रुवारी 1921 रोजी ड्युक ऑफ कनॉट यांच्या हस्ते त्याची पायाभरणी आणि गव्हर्नर-जनरल लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते 18 जानेवारी 1927 रोजी उद्घाटन झाले. पिवळसर आणि तांबड्या दगडांचा वापर करून उभारलेली ही वर्तुळाकार इमारत असून तिच्या पहिल्या मजल्यावरील व्हरांड्याच्या भोवतीने असलेले 26 फूट उंचीचे 144 स्तंभ या इमारतीची शोभा वाढवत आहेत. याच इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मध्यवर्ती सभागृहाच्या (Central Hall) वर 98 फूट त्रिज्येचा घुमट आहे. 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत याच सभागृहात स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे काम पार पडले होते. या मध्यवर्ती सभागृहाच्या भोवतीच्या तीन विभागांमध्ये लोक सभा, राज्य सभा आणि ग्रंथालय आहे. क्रांतिकारक भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 ला भारत सरकारने केलेल्या Public Safety Bill आणि Trade Dispute Bill यांच्या निषेधार्थ सध्या लोक सभा असलेल्या सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून बाँब टाकला होता.

      नव्या राजधानीतील व्यावसायिक केंद्र म्हणून 1929 ते 1933 दरम्यान कनॉट प्लेसची निर्मिती केली गेली. त्याचबरोबर तीन मूर्ती भवन, नॅशनल स्टेडिअम, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, संस्थानिकांसाठीची निवासस्थाने अशा अनेक महत्वाच्या इमारतीही या काळात नवी दिल्लीत उभारल्या गेल्या.

      आज नवी दिल्ली भारताची राजधानी होऊन 110 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पाठोपाठ भारताच्या स्वातंत्र्यालाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. गेली 110 वर्षे नवी दिल्ली हे भारताचे मुख्य सत्ताकेंद्र राहिलेले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील राजपथ, रायसीना परिसर आणि अन्य ठिकाणांचा चेहरामोहरा बदलला जात आहे. त्यासाठी सुमारे 30,000 कोटी रुपयांचा Central Vista प्रकल्प राबवला जात आहे.

      भारताच्या नव्या राजधानीत उभारल्या गेलेल्या ऐतिहासिक वास्तूंविषयी आगामी काळात या ब्लॉगवरून लेख वाचायला मिळतीलच.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा