नीली वर्दीवालों का दल

 

      8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील. हवाईदलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे 8 ऑक्टोबरला हिंदन हवाईदल स्थानकावर मुख्य आणि दिमाखदार समारंभ पार पडला.

      भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर खोर्सचे इंडियन एअर फोर्स (भारतीय हवाईदल) झाले. दुसरे महायुद्ध, 1948, 1965 आणि 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धे, 1984 मधले ऑपरेशन मेघदूत, 1987 मधले ऑपरेशन पुमालाई आणि ऑपरेशन पवन, 1999 मधला कारगिल संघर्ष या महत्वाच्या प्रसंगांमध्ये भारतीय हवाईदलाने महत्वाची कामगिरी बजावलेली आहे.

      युद्धप्रसंगी शत्रूला सर्वात जलदतेने प्रत्युत्तर देणारे आपले हवाईदल नैसर्गिक आपत्तीच्या काळातही सर्वात जलदतेने मदतकार्य पोहचवत आहे. एप्रिल-21 मध्ये देशात आलेल्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. त्यावेळी तातडीने देशाच्या विविध भागांमधून आणि विदेशांमधूनही ऑक्सिजन टँकर्स आणून ते ऑक्सिजन भरणा केंद्रांपर्यंत पोहचवण्यात हवाईदलाने अतिशय महत्वाची भूमिका बजावली. या काळात भारतीय हवाईदलाच्या मालवाहू विमानांनी 1800 च्या आसपास उड्डाणे करत साडेबारा लाख सागरी मैलांपेक्षा जास्त प्रवास केला.

      केवळ भारतातील नाही, तर अन्य देशांमधील नैसर्गिक आपत्तींच्या काळातही भारतीय हवाईदल तातडीने मदत पोहचवत आहे. 2004 मध्ये अमेरिकेतील न्यू ऑर्लिंस राज्यात आलेल्या कॅटरिना चक्रीवादळानंतर तेथील सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. अशा वेळी मदतसाहित्य घेऊन तेथे पोहचलेले पहिले विदेशी विमान भारतीय हवाईदलाचे आयएल-76 एमडी हे होते.

      मालदिव, श्रीलंका यांसारख्या ठिकाणी निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत तेथील लोकनियुक्त सरकारच्या विनंतीवरून त्याच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाने मोहीम राबवली होती. जगाच्या कोणत्याही प्रदेशात उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतून आपल्या नागरिकांबरोबरच इतर देशांच्या नागरिकांची सुटका करण्यात आपल्या हवाईदलाने कायमच सक्रीय योगदान दिले आहे. या वर्षी अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा सत्ता ताब्यात घेतल्याने तेथे अतिशय अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांबरोबरच अन्य देशांच्या नागरिकांचीही भारतीय हवाईदलाने सुरक्षित सुटका केली. भारतीय हवाईदलाने काँगो, सिएरा लिओन इत्यादी देशांमध्ये राबवण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांततारक्षण मोहिमांमध्ये भार घेतलेला आहे.

सूर्यकिरण टीम.

सारंग टीम.
      भारतीय हवाईयोद्ध्यांनी विमानांच्या कसरतींमध्येही आपले कौशल्य सिद्ध केलेले आहे. विमानांच्या चित्तथरारक कसरती करणाऱ्या सूर्यकिरण आणि हेलिकॉप्टरच्या कसरती करणाऱ्या सारंग या पथकांनी तर जगात नाव कमावलेले आहे. सारंग पथकाने या वर्षी मॉस्कोमध्ये आयोजित माक्स-21 या आंतरराष्ट्रीय हवाई प्रदर्शनात पहिल्यांदा आपले कौशल्य सादर केले.

     आज भारतीय हवाईदलात रफालसारखी मध्यम पल्ल्याची अत्याधुनिक लढाऊ विमाने; एमआय-17 व्ही-5, चिनूक आणि अपाचे यांसारखी हेलिकॉप्टर्स; आकाश, ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रे; रडार अशी विविध प्रकारची साधनसामग्री सामील झाली असून येत्या काळात 114 मध्यम पल्ल्याची बहुउद्देशीय लढाऊ विमाने, हलकी हेलिकॉप्टर्स, एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा, सी-295 लहान मालवाहू विमाने हवाईदलाला मिळणार आहेत.

      जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि व्यावसायिकतेला महत्व देणारे भारतीय हवाईदल आज हिंदी महासागर क्षेत्रातील सर्वात प्रबळ हवाईदल आहे. शीतयुद्धोत्तर कालखंडात भारताच्या राष्ट्रहितांचा विस्तार त्याच्या भौगोलिक सीमेच्याही बराच पलीकडेपर्यंत झालेला आहे. परिणामी पहिला प्रतिसाद देणारा (First Responder) या नात्याने आपल्या हवाईदलावरील जबाबदारी वाढलेली असून त्याची कार्यकक्षा मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. ही विस्तृत जबाबदारी पार पाडण्यासाठी हवाईदलात सुखोई-30 एमकेआय, आयएल-78 एमकेआय (टँकर), सी-17 ग्लोबमास्टर-3, एवॅक्स यासारखी विविध विमाने-यंत्रणा सामील केल्या गेल्या आहेत. या सगळ्या साधनसामग्रीमुळे भारतीय हवाईदलाची व्यूहात्मक पोच वाढलेली आहे. म्हणूनच भारतीय हवाईदल आता केवळ आपल्या हवाईसीमांचे संरक्षण करणारे हवाईदल राहिलेले नसून ते व्यूहात्मक हवाईदल म्हणून ओळखले जात आहे.

अलास्कामधील रेड फ्लॅग-16 युद्धसरावात
सहभागी झालेले भारतीय हवाईदल. (सर्व फोटो-पीआयबी)

     सध्या हवाईदलाकडे मर्यादित सामग्री उपलब्ध आहे. तरीही हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपासून हिंदी महासागरापर्यंत आणि अरबी समुद्रापासून अंदमान व निकोबार द्वीपसमूहापर्यंत विस्तारलेल्या भारताच्या हवाई क्षेत्राचे आणि त्याच्याही पलीकडे विस्तारलेल्या भारताच्या राष्ट्रहितांचे सक्षमपणे रक्षण करत आहे. विविध देशांच्या हवाईदलांबरोबर होणाऱ्या संयुक्त युद्धसरावांच्या माध्यमातून आंतरखंडीय तैनातीमधील कौशल्य भारतीय हवाईदल दाखवून देत आले आहे. अशा निळ्या वर्दीतील आपल्या आकाशयोद्ध्यांना 89 व्या वर्धापन दिनी कडक सलाम...

टिप्पण्या

  1. लेख माहितीपूर्ण आहे. आपल्या हवाई दलाविषयी वाचून त्याचा अभिमान वाटला.

    उत्तर द्याहटवा
  2. लेख आवडला. हवाई दलाबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा