क्रीडा महाकुंभ - ऑलिंपिकोत्सव

लंडन 2012 ऑलिंपिकमधील भारताचे पदकविजेते खेळाडू


      जगभर 2020 मध्ये पसरलेल्या आणि अजूनही चिंताजनक स्थिती असलेल्या कोव्हीड-19 महासाथीच्या पार्श्वभूमीवर अखेर 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोक्यो ऑलिंपिक स्पर्धा होत आहेत. या महासाथीमुळे वर्षभर लांबलेल्या या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत अनिश्चितता होती. हो-नाही-हो-नाही या वादावर अखेर पडदा पडला आहे.

ऑलिंपिक म्हणजे सळसळता उत्साह. ऑलिंपिक म्हणजे जगातील सर्वोच्च दर्जाची आणि सर्वोच्च मानाची स्पर्धा. ऑलिंपिक म्हणजे अत्युच्च दर्जाची क्रीडांगणे. जगातील या सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचे ब्रीदच आहे - वेगवान, उच्च आणि बळकट. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या देशासाठी पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसेच ऑलिपिंकचे आयोजन करून आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे प्रत्येक देशाचे स्वप्न असते. १८९६ मध्ये सुरू झालेली ऑलिंपिक चळवळ आता चांगली बहरली आहे. पैशासाठी नाही, तर देशासाठी खेळण्याची, देशाचा सन्मान वाढविण्याची आणि स्वतःलाही वेगवान, उच्च आणि बळकट सिद्ध करण्याची धडपड या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूमध्ये क्षणोक्षणी दिसते. दोन ऑलिंपिकदरम्यानच्या कालावधीतील विविध स्पर्धांमधील कामगिरीचा आढावा घेऊन आणि पात्रता फेऱ्या पार करून आगामी ऑलिंपिकसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूचा पुढचा पदकासाठीचा संघर्ष असतो तो त्याच्यासारखा विविध पातळ्यांवर विविध चाचण्यांमधून तावून-सलाखून स्पर्धेत उतरलेल्या जगातील अन्य सर्वश्रेष्ठ खेळाडूंशी. त्यामुळे स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी केल्यावर पोडियमवर चढलेल्या खेळाडूला, त्याच्या प्रशिक्षकाला आणि समोर बसलेल्या समर्थक प्रेक्षकांना (हे सगळे कितीही मनाने घट्ट असले तरी) आपला राष्ट्रध्वज उंचावत असताना भावना अनावर होतात. आपला राष्ट्रध्वज केवळ आपल्यामुळेच आता जगासमोर मानाने उंचावला जात आहे, हे पाहून त्या खेळाडूला जास्तच भावूक व्हायला होते. त्यातही सुवर्णपदक जिंकलेले असेल, तर सोबत राष्ट्रगीतही वाजत असते. अशा वेळी भलेभलेही ढसाढसा रडू लागलेले बऱ्याचवेळा पाहायला मिळतात. त्या आनंदाश्रूंच्यामागे दडलेले असतात त्याने ऑलिंपिकपदकासाठी घेतलेले विविध पातळ्यांवरचे कष्टच!

ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी आणि पदक जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडूची कायम इच्छा असते. त्यासाठी तो सतत परिस्थितीशी संघर्ष करत असतो. हा संघर्ष विविध पातळ्यांवर सुरू असतो. आयुष्यभर राखलेले स्वप्न अगदी नॅनो फरकानेही सत्यात उतरते किंवा भंगही पावत असते. पुन्हा चार वर्षांनी ऑलिंपिकमध्ये तयारीने उतरावे, तर परिस्थिती अनेक दृष्टीने बदललेली असते. त्यामुळे पदकाचे स्वप्न पूर्ण होईल की नाही याबद्दल खात्री देता येत नाही.

खेळाडूचा ऑलिपिंकसाठीचा आणि ऑलिंपिकमधील संघर्ष भारतात अन्य छोट्या-मोठ्या देशांपेक्षा जास्तच जाणवत आला आहे. आमच्यासारख्या क्रिकेटवेड्यांच्या देशात ऑलिंपिकला फक्त दोनेक महिनेच गांभीर्याने घेण्याची परंपरा आहे. चार वर्षे ऑलिंपिक आणि त्यातील खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे आमच्या समाजापासून, सरकारपासून आणि लोकांना आवडत नाही या कारणाखाली मीडियापासून दूर राहतात. चार वर्षे टी. व्ही.समोर बसून क्रिकेट सामन्यांमध्ये डोळे घालून बसण्यात आम्ही वेळ घालवतो. ऑलिंपिक सुरू व्हायच्या एक-दोन महिने आधीच आम्हाला त्याची आठवण होते आणि एकदम सुवर्णपदकाचीच मागणी मीडिया आणि समाजाकडून होऊ लागते. पण इतर देशांमध्ये याच्याबरोबर उलट परिस्थिती असल्याचे, अंधानुकरणाची सवय जडलेल्या आम्हा क्रिकेटवेड्यांना समजतच नाही. म्हणूनच मग ते देश भारतापेक्षा लहान किंवा अविकसित असले तरी भारतापेक्षा सरस कामगिरी करून जातात. कारण तिथे ऑलिंपिककडे, खेळाडूंच्या तयारीकडे सरकारी पातळीवरून महिनाभर आधी लक्ष्य दिले जात नाही, तर कायमच लक्ष्य दिले जाते. तिथे समाजही ऑलिंपिकमधील क्रीडाप्रकारांना, खेळाडूंना कधीच विसरत नाही.

भारतात सामाजिक, सरकारी आणि राजकीय पातळीवर अशी निराशाजनक वातावरण असूनही गेल्या पाच-सहा ऑलिंपिकमध्ये खासगी क्रीडा प्रशिक्षण संस्थामध्ये घडलेल्या आणि पदके जिंकणाऱ्या भारताच्या ऑलिंपिकपटूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त अभिमान वाटत आहे. आणि त्याचवेळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश नाही याचे दुःख कधीच वाटत नाही; उलट त्याचा आनंदच जास्त होतो आहे. या कारणामुळेच ऑलिंपिकमधील माझा रस आणखी वाढला आहे. त्यातच चार वर्षे कधीही फारसे पाहायला न मिळणारे क्रीडाप्रकारही ऑलिंपिक आवर्जून माझ्या दृष्टीस आणून देते. त्यामुळं उन्हाळी असो वा हिवाळी, ऑलिपिंक म्हटले की उत्साह वाढतो. ऑलिंपिक जवळ येऊ लागले की, वर्ष-दोन वर्षे आधीपासूनच उत्साह वाटायला लागतो, तो त्यामुळंच.

ऑलिंपिकमध्ये खेळाडूला पैसे मिळत नाहीत, पण त्याच्या तेथील कामगिरीनंतर त्याला मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून मिळणारा पैसा अमाप असू शकतो. पण त्याही परिस्थितीत खेळाडूने आपले प्राधान्यक्रम निश्चित ठेवावे लागतात. कारण नंतरच्या काळात पैशाच्यामागे लागल्यास त्याच्या पुढच्या ऑलिंपिकमधील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्या तयारीवर पूर्ण लक्ष्य केंद्रीत करत आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेऊन टोक्यो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सगळ्या भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा.

टिप्पण्या

  1. नमस्कार, आमच्या येत्या दिवाळी अंकासाठी काही लिखाण पाठवता येईल का ? अभिप्राय कळवावा
    नियमावली ची लिंक खालील प्रमाणे आहे :
    https://www.marathicultureandfestivals.com/invitation-diwali-2021
    माझा इमेल : kokatayash@gmail.com

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा