कोचीतील
गोदीत भारतीय नौदलासाठी बांधल्या जात असलेल्या पहिल्यावहिल्या स्वदेशी विमानवाहू
जहाजाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. याचे जलावतरण झाल्यानंतर अशा प्रकारचे आणखी
एक स्वदेशी विमानवाहू जहाज बांधण्याचे काम सुरू करण्याची योजना होती. ही योजना
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून विचाराधीन होती. मात्र निधीची कमतरता आणि
दुसऱ्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे स्वरुप याबाबत अंतिम निर्णय होऊ न शकल्याने तूर्तास
दुसऱ्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचा विचार थंड बस्त्यात गेल्याचे नुकत्याच प्रकाशित
झालेल्या काही वृत्तांवरून दिसत आहे.
भारतीय नौदलासाठी स्वदेशातच दोन विमानवाहू जहाजे
बांधण्याचा विचार १९८९ मध्ये सर्वप्रथम मांडला गेला होता. मात्र संरक्षण
क्षेत्रातील प्रत्येक प्रकल्प रेंगाळण्याची परंपरा याही बाबतीत कायम राहिली आहे. त्यामुळे
पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज भारतीय नौदलात सामील होण्यास २०२३ पर्यंत वाट पाहावी
लागणार आहे. पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे १२ ऑगस्ट २०१३ रोजी जलावतरण झाले
होते. त्यानंतर तेथे बांधल्या जाणारे दुसरे स्वदेशी विमानवाहू जहाज पहिल्या
जहाजाप्रमाणेच असावे की त्याच्यापेक्षा वेगळे असावे याचा विचार २०१२ च्या मध्यापासून
सुरू आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय न होऊ शकल्यामुळे त्याचे अजूनही आरेखन होणे
बाकी आहे.
सध्याची परिस्थिती पाहता त्या जहाजाची बांधणी
सुरू होण्यास किमान तीन वर्षे तरी लागतील. त्यानंतरही सर्व घटक अनुकूल राहिले, तर ते
जहाज नौदलात दाखल होण्यासाठी आणखी किमान सात वर्षे लागणार आहेत. मात्र आता निधीची
कमतरता आणि नौदलाच्या अन्य गरजा पूर्ण करण्याची आवश्यकता यांचा विचार करून दुसऱ्या
विमानवाहू जहाजाचा विचार किमान १५ वर्षे तरी बाजूला पडण्याची शक्यता व्यक्त होत
आहे.
भारतीय नौदलाने हे नवे जहाज कसे असावे याचे काही
ठोकताळे निश्चित केले आहेत. त्यानुसार या जहाजावर कॅटोबार यंत्रणा (कॅटापल्ट
असिस्टेड टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी) बसविली जाणार आहे. जहाजावरून उड्डाण करताना
विमाने कॅटापल्टची मदत घेणार आहेत. या यंत्रणेमुळे या जहाजाच्या डेकवरील धावपट्टीच्या
पुढील बाजूला ऊर्ध्व दिशेने कोन (स्की जंप) करण्यात येणार नाही, तर ती पूर्णपणे
सपाट असेल. त्याचवेळी ही कॅटोबार यंत्रणा पारंपारिक पद्धतीची वाफेवर आधारलेली
असावी की नव्या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक पद्धतीची असावी यावर चर्चा सुरू आहे.
भारताच्या हितसंबंधांचे क्षेत्र हिंदी
महासागराच्याही पलीकडे विस्तारत आहे. त्यामुळे भविष्यात नौदलाला शत्रुच्या हवाई
हल्ल्याची पूर्वसूचना देणारी ॲवॅक्स विमाने आणि इंधनवाहू विमानेही विमानवाहू
जहाजांवरून हाताळावी लागणार आहेत. अशा विमानांसाठी अशी धावपट्टीच आवश्यक असते.
सुमारे ६५ हजार टन वजनाचे हे जहाज भारतात
बांधले जाणारे हे आजपर्यंतचे सर्वांत मोठे जहाज ठरणार आहे.
चीनच्या राष्ट्रहितांचाही
विस्तार हिंदी महासागर, आफ्रिका आणि आशिया-प्रशांत क्षेत्रामध्येही झाला आहे. त्यामुळे
मुख्य भूमीपासून दूरवर असलेल्या प्रदेशावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी विमानवाहू
जहाजांची चीनलाही नितांत आवश्यकता भासत आहे. एकीकडे भारतात विमानवाहू जहाजांचे
सामिलीकरण रखडत असून त्याचवेळी त्यांची संख्या पुढील काळात मर्यादित ठेवण्याचा
विचार होत आहे, तर त्याचवेळी चीनने आपल्या नौदलात विमानवाहू जहाजांचे सामिलीकरण
करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.
विमानवाहू
जहाजांच्या संचालनाच्या बाबतीत अजून तरी भारताची बाजू चीनपेक्षा वरचढ आहे. या
जहाजांच्या संचालनाचे तंत्र अतिशय क्लिष्ट असते. चीन याबाबतीत नवखा असल्याने त्याला
ती क्षमता प्राप्त करण्यासाठी कमीतकमी दहा वर्षे तरी लागतील. मात्र एकदा ठरविल्यावर
धडाडीने प्रकल्प पूर्ण करण्याची चीनची खासियत आहे. त्यामुळे चीन आणखी विमानवाहू
जहाजांचा नियोजित कालावधीत नौदलात समावेश करेल.
चीनच्या वाढत्या नाविक ताकदीच्या आणि
त्याच्या हिंदी महासागरातील वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारताने दुसऱ्या
विमानवाहू जहाजाच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. `हिंदी महासागरातील सर्वांत प्रबळ नौदल' असा दरारा निर्माण केलेल्या भारतीय नौदलाची
सामरिक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. शीतयुद्धानंतर
बदललेल्या सुरक्षाविषयक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाला किमान ३
विमानवाहू जहाजांची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र अशा वेळी त्याच्याकडे सध्या एकच
विमानवाहू जहाज - भा. नौ. पो. विक्रमादित्य (आय.एन.एस. विक्रमादित्य) कार्यरत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा